स्वदेस न्यूज (प्रतिनिधी)
वारकरी परंपरेचा भक्तिभाव आणि सूफी संस्कृतीची सुरेल मैफल यांचा अनोखा संगम घडवत नाना पेठ-भवानी पेठ परिसरात शुक्रवारी काढण्यात आलेल्या **’सर्वधर्मीय अभिवादन दिंडी’**ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संत ज्ञानेश्वर-तुकारामांच्या जयघोषात मुस्लिम, बौद्ध, शीख आणि ख्रिश्चन धर्मगुरूंसह विविध धर्मीय नागरिक एकत्र सहभागी होत ‘मानवता हाच खरा धर्म’ हा संतांचा विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा संदेश दिला.
श्री निवडुंगा विठोबा मंदिर ते रिझवानी मस्जिद या मार्गावर निघालेल्या दिंडीने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. संतांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. दिंडीचे ठिकठिकाणी पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले, तर अनेकांनी या अनोख्या सोहळ्याची छायाचित्रे आणि दृकश्राव्य चित्रफीत टिपत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जपणाऱ्या या उपक्रमाचे स्वागत केले.
शिवमहोत्सव समिती, साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर मंडळ, रिझवानी मस्जिद, दि मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक, सूफी वारकरी विचारमंच, पी. ए. इनामदार विद्यापीठ आणि विविध समविचारी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि भारतीय संविधानाच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलशेठ मणियार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
हभप. विकास लवांडे, ख्रिश्चन धर्मगुरू फादर डॉ. अविनाश वाघमारे, बौद्ध धर्मगुरू भंते हर्षवर्धन, सूफी वारकरी विचारमंचाचे उमर शरीफ यांच्यासह विविध धर्मांचे प्रतिनिधी आणि शेकडो नागरिक दिंडीत सहभागी झाले होते. साखळीपीर तालीम येथून प्रारंभ झालेली दिंडी पारशी अग्यारी, श्री निवडुंगा विठोबा मंदिर, धान्य बाजार, पानसरे धर्मशाळा, गूळ आळी, बुरूड पूल, अंगरशा बाबा दर्गा आणि श्रमदान मारुती मार्गे गंज पेठेतील रिझवानी मस्जिद येथे पोहोचली.
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सहभागींचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर व्हेज बिर्याणी आणि शिरखुर्म्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी हभप. विकास लवांडे म्हणाले, “भेदाभेद अमंगळ… या रे या सारे जण,” असा संतांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वारकरी परंपरेत स्थान नसून, समाजातील दरी दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
फादर डॉ. अविनाश वाघमारे यांनी, “रुग्णाला रक्त देताना त्याचा धर्म विचारला जात नाही. माणुसकी हेच सर्वोच्च मूल्य आहे. महाराष्ट्राच्या चांगुलपणाचा वारसा अशा उपक्रमांतून अधिक दृढ झाला पाहिजे,” असे मत व्यक्त केले.
भंते हर्षवर्धन यांनी या उपक्रमाला संविधान आणि सर्वधर्मसमभावाचा खरा उत्सव संबोधले. तर उमर शरीफ यांनी, “रविंद्र माळवदकर यांच्या नेतृत्वातून समाजात एकात्मतेची विचारधारा रुजत असून, अशा प्रयत्नांना सर्व समाजाने पाठबळ द्यावे,” असे आवाहन केले.
रविंद्र माळवदकर यांनी सर्वधर्मीय अभिवादन दिंडीमागील भूमिका स्पष्ट करत गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाला मिळत असलेल्या लोकसहभागाबद्दल समाधान व्यक्त केले. वर्क चॅरिटेबल ट्रस्टचे महंमद आवैस यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या युवती शाखेच्या शिवानी माळवदकर आणि युवा नेते शिवराज माळवदकर यांनी केले.






