स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे जुन्नरहून
देशाच्या सीमांचे संरक्षण करत तब्बल २५ वर्षे लष्करात सेवा बजावणारे जुन्नर तालुक्यातील खोडद येथील माजी सैनिक रमेश गणपत खरमाळे यांनी निवृत्तीनंतर पर्यावरण आणि जलसंवर्धनाची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. कुटुंबीय, ग्रामस्थ आणि वनविभागाच्या सहकार्याने त्यांनी डोंगराळ भागात ७० जलशोषक चर खोदून दरवर्षी सुमारे आठ लाख लिटर पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याची किमया साधली. या उपक्रमामुळे भूजलपातळीत लक्षणीय वाढ झाली असून १५ वर्षे कोरड्या पडलेल्या विहिरींना पुन्हा पाणी लागले आहे. एकेकाळी ओसाड असलेल्या टेकड्यांवर आता हिरवाई बहरली असून त्यांच्या कार्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे.
देशसेवेनंतर आता जलसेवेकडे वळत एका जवानाने पुन्हा एकदा दमदार पाय रोवले आहेत. डोळ्यांमध्ये हिरवे स्वप्न घेऊन त्याने आता पाणीबचतीचा व जलसंवर्धनाचा ध्यास घेतला आहे. या जवानाचे नाव आहे रमेश खरमाळे.
जुन्नर तालुक्यातील खोडद येथील रहिवासी रमेश खरमाळे यांनी पत्नी स्वाती खरमाळे आणि मुलांच्या मदतीने खडकाळ डोंगरावर ७० जलशोषक चर खोदले आहेत. या चरांमुळे प्रत्येक पावसाळ्यात सुमारे आठ लाख लिटर पावसाचे पाणी जमिनीत मुरते. परिणामी पाण्याची बचत होण्याबरोबरच भूजलपातळीतही वाढ झाली आहे. या जलसंधारणाच्या कामामुळे तब्बल १५ वर्षे कोरड्या पडलेल्या परिसरातील विहिरींना नवजीवन मिळाले असून आजूबाजूच्या १५ शेतकरी कुटुंबांच्या शेतीला त्याचा थेट लाभ झाला आहे.
जलसंधारणाबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठीही खरमाळे यांनी पुढाकार घेतला आहे. झाडांची संख्या वाढावी, या उद्देशाने ते पत्नीच्या सहकार्याने गावकऱ्यांना विविध वृक्षांची बियाणे वाटप करतात. याचबरोबर वडज परिसरात ग्रामस्थांच्या सहभागातून २०० हून अधिक स्थानिक प्रजातींची झाडे लावून त्यांनी ‘ऑक्सिजन पार्क’ विकसित केले आहे. त्यामुळे परिसरातील जैवविविधतेलाही चालना मिळाली आहे.
रमेश खरमाळे यांनी मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये २५ वर्षे देशसेवा बजावल्यानंतर २०१२ मध्ये निवृत्ती स्वीकारली. आईच्या उपचारांसाठी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर त्यांनी गावातील आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोफत लष्करी व पोलीस भरतीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. सध्या ते वनविभागात वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. जंगलातील वणव्यांचा धोका कमी करण्यासाठी ते दरवर्षी स्वतः गवत कापून सुमारे ३५ फूट रुंदीचे जाळपट्टे तयार करतात, ज्यामुळे आग पसरण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल रमेश खरमाळे यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या निस्वार्थ सेवाभावाची आणि लोकसहभागातून उभारलेल्या जलसंवर्धन चळवळीची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली असून, त्यामुळे त्यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावरही विशेष मान्यता मिळाली आहे.





