स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे तामिळनाडूहून
पावसाचे पाणी साठवण्यासाठी मोठमोठे प्रकल्प आणि महागडी तंत्रज्ञानाची गरज असते, असा समज असताना तामिळनाडूतील एका आयएएस अधिकाऱ्याने उपलब्ध साधनांचा कल्पक वापर करत जलसंधारणाचा अनोखा प्रयोग केला. तिरुवल्लूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना आयएएस अधिकारी प्रताप मुरुगन यांनी १,२०० हून अधिक सुकलेल्या आणि पडीक बोअरवेल्सचे रूपांतर ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ अर्थात भूजल पुनर्भरण यंत्रणेत केले. या उपक्रमामुळे अनेक भागांतील भूजल पातळीत वाढ झाल्याचे सांगितले जाते.
तिरुवल्लूर जिल्ह्यात भूगर्भातील पाण्याची पातळी सातत्याने कमी होत होती. अनेक बोअरवेल्स कोरड्या पडल्याने त्या निरुपयोगी झाल्या होत्या. शेतकऱ्यांना पाण्यासाठी अधिक खोल बोअरवेल्स खोदाव्या लागत होत्या. दुसरीकडे, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध असूनही ते नाले आणि ओढ्यांमधून वाहून जात होते. ही परिस्थिती पाहून प्रताप मुरुगन यांनी पडीक बोअरवेल्स बंद करण्याऐवजी त्यांचा वापर भूजल पुनर्भरणासाठी करण्याची कल्पना मांडली.
प्रशासनाच्या मदतीने १,२०० हून अधिक पडीक बोअरवेल्सना ‘ग्राऊंडवॉटर रिचार्ज’ यंत्रणेशी जोडण्यात आले. पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता योग्य पद्धतीने या बोअरवेल्सकडे वळवण्यात आले. त्यामुळे पाणी जमिनीत खोलवर मुरण्यास मदत झाली आणि भूजलसाठा वाढण्यास हातभार लागला.
विशेष म्हणजे या उपक्रमासाठी मोठ्या धरणांचा किंवा महागड्या तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात आला नाही. उपलब्ध पायाभूत सुविधांचा आणि स्थानिक पातळीवरील सहकार्याचा वापर करून हा प्रयोग राबवण्यात आला.
या उपक्रमाचा पहिल्याच पावसाळ्यानंतर परिणाम दिसला. या उपक्रमानंतर अनेक भागांमध्ये भूजल पातळीत ५ ते १० फुटांपर्यंत वाढ झाल्याचे सांगितले जाते. सुकलेल्या विहिरी आणि हातपंपांना पुन्हा पाणी मिळाले. पाण्याच्या टँकरवर अवलंबून असलेल्या काही गावांना तसेच शेतीसाठी पाण्याची गरज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
प्रताप मुरुगन यांचा जन्म विरुधुनगर येथील शेतकरी कुटुंबात झाला. पाण्याचे महत्त्व आणि त्याची टंचाई त्यांनी बालपणापासून अनुभवली. त्यामुळे प्रशासनात काम करताना पाणी संवर्धनाला त्यांनी विशेष महत्त्व दिले. कोरड्या बोअरवेल्सचा उपयोग करून पावसाचे पाणी जमिनीत पोहोचवण्याचा हा प्रयोग कमी खर्चात स्थानिक साधनांचा प्रभावी वापर कसा करता येतो, याचे हा उपक्रम उदाहरण ठरला आहे. प्रसिद्ध अभिनेते आर. माधवन यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे.





