स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे बंगळुरूहून
अचानक झालेल्या अपघातानंतर अनेकांचे जीवनच बदलून जाते. काही जण यातून बाहेर पडून पुन्हा पूर्ववत आयुष्य जगतात, तर काही जणांच्या आयुष्याला कलाटणी मिळते. त्यांचे आयुष्य पुढे खडतर बनते. परंतु, यावरही काही लोक धैर्य आणि जिद्दीने मात करत फक्त स्वत:चेच आयुष्य नाही तर इतरांचेही आयुष्य सुखकर बनवतात. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे प्रतीक खंडेलवाल. अपघातानंतर अर्धांगवायू झालेले उद्योजक प्रतीक खंडेलवाल यांनी दिव्यांगासाठी बंगळूरू येथे ‘रॅम्पमायसिटी’ हा स्टार्टअप सुरू केला आहे. ज्यामुळे सार्वजनिक ठिकाणी दिव्यांग लोकही सहजतेने वावरू शकतील. आज त्यांच्या या प्रयत्नाला चांगले यश येत आहे.
प्रतीक हे एक यशस्वी व्यावसायिक होते. मात्र, एका अपघातानंतर त्यांचे सारे आयुष्यच बदलून गेले. अपघातानंतर पहिले चार वर्षे त्यांना अतिशय खडतर गेले. या कालावधीत शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ते स्थिर झाले. परंतु, पूर्वीप्रमाणे ते जिथे जायला आवडेल तिथे ते जाऊ शकत नव्हते. मात्र, खच्ची न होता त्यांनी या सर्व अडचणींवर मात करण्याठी स्वत:च कणखर झाले. तसेच, बाहेरील जगाशी संपर्क साधण्यासाठी स्वत:च सक्षम असावं याच प्रेरणेने त्यांनी २०२० मध्ये ‘रॅम्पमायसिटी’ स्थापन केले. स्वत: व्हिलचेअरवर असताना आपल्यासारख्या इतर दिव्यांगांनाही याची मदत व्हावी आणि त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, हाच त्यामागील हेतू असल्याचे ते सांगतात.
या उपक्रमाची सुरुवात रेस्टॉरंट्सना रॅम्प बसवण्यासाठी तयार करण्याच्या मोहिमेने झाली. यामध्ये रॅम्प, अॅक्सेसिबिलिटी ऑडिट, रेट्रोफिटिंग आणि बरेच काही समाविष्ट आहे. आतापर्यंत, प्रतीकने बेंगळुरू, गोवा, गुडगाव आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये ५३० हून अधिक रॅम्प बसवण्यास मदत केली आहे.
प्रतीकसाठी एक प्रमुख आव्हान होते ते म्हणजे रॅम्पच्या गरजेबद्दल जागरूकतेचा अभाव. यामुळे प्रायोजकांना आकर्षित करणे कठीण होते. तसेच ‘रॅम्पसाठी सिमेंट किंवा विटांचे काम लागत नाही. त्यामुळे प्रतिकच्या कार्यशाळेत त्याने स्टील आणि अॅल्युमिनियम रॅम्प तयार करण्याचा निर्णय घेतला, जे कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळेला त्याचा वापर केला जाऊ शकतो.
२०२२ मध्ये लोकसभा खासदार तेजस्वी सूर्या यांनी त्यांच्या कामाची दखल घेतली आणि त्यांना बंगळूरूमधील १० प्रमुख सरकारी इमारतींमध्ये रॅम्प बसवण्यास सांगितले. त्यानंतर या स्टार्टअपने एका उद्यानात, रुग्णालयात आणि इतर ठिकाणी रॅम्प बसवण्यास यशस्वीरित्या सुरुवात केली. ‘डुनझोने या उपक्रमाचे प्रायोजकत्व घेतल्याने, त्यांनी वीस दिवसांत १० रॅम्प जोडले.
आज, रॅम्पमायसिटीने दिल्ली, सायबर हब, गोव्यातील गॅलेरिया मार्केट आणि मुंबईतील लोकप्रिय बाजारपेठांसह विविध शहरांमध्ये विस्तार केला आहे.
याविषयी प्रतीक खंडेलवाल म्हणतो, ‘आमची टीम लहान असली तरी, आम्ही सतत काम करत असतो. रॅम्प बसवणे वाटते तितके सोपे नाही; शहराच्या असंघटित वाढीमुळे त्यासाठी अनेक वेळा ऑडिट आणि सर्वेक्षण करावे लागतात. कायद्यांनी रॅम्प मानके निश्चित केली असली तरी, जागेच्या अडचणी, पार्किंग आणि ड्रेनेज सारख्या अडथळ्यांमुळे विद्यमान पायाभूत सुविधा अनेकदा या मानकांची पूर्तता करत नाहीत. ‘प्रत्येक स्थानासाठी सर्वोत्तम प्रकारचा रॅम्प निश्चित करण्यासाठी आम्ही प्रथम तांत्रिक ऑडिट करतो. त्यानंतरच तेथील स्थानाच्या गरजेनुसार ते बसवतो.
बंगळूरू बनले व्हीलचेअर अनुकूल शहर
प्रतीक बंगळूरूला भारतातील सर्वात व्हीलचेअर-अनुकूल शहरांपैकी एक बनवत आहे. येथे त्याच्या स्टार्टअपने चर्च स्ट्रीट, १०० हून अधिक रेस्टॉरंट्स, पोलिस स्टेशन, मॉल्स आणि एटीएममध्ये रॅम्पिंग केले आहे. तसेच, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ७० हून अधिक रॅम्प बसवले. ज्यामुळे ते भारतातील सर्वात व्हीलचेअर-प्रâेंडली शहरांपैकी एक बनले आहे.






