मराठमोळ्या मल्हार कळंबेने हटवला १००० टन कचरा
संयुक्त राष्ट्रांकडून देखील ‘व्ही’ अवॉर्ड’ने सन्मानित
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे मुंबईहून
आपल्यापैकीच काही माणसं अशी असतात ज्यांना आपल्या कर्तव्याचे भान असते आणि ते कर्तव्य बजाविण्यासाठी ते वेगळा मार्ग देखील चोखाळतात. असचं काहीसं वेगळं पण समाजाशी बांधिलकी असणारं काम मुंबईमध्ये राहणार्या २१ वर्षांच्या मल्हार कळंबे याने करून दाखविले आहे. त्याने दादर चौपाटीवरून १००० टन कचरा हटविण्याचे काम केले आहे. त्याच्या या कामाची दखल नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेत त्याला पुरस्कार देऊन सन्मानित करून त्याचे कौतुक केले आहे. संयुक्त राष्ट्रांनी देखील याची दखल घेतली असून त्याला यूएन तर्पेâ ‘व्ही अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे.
खरं तर ही गोष्ट आताची नाही तर जवळपास दोन वर्षांपूर्वीची आहे. मुंबईतील गजबजलेल्या परिसरात राहणार्या मल्हारने आधी आपल्या मित्रांना एकत्र करून दादर चौपाटीवर जाऊन तेथील कचरा एकत्र केला. मल्हारला आपल्या या कामातून एक नवीन बदल घडून आणण्याची इच्छा आहे. त्यामुळेच त्याच्या डोक्यात ‘बीच प्लीज’ची संकल्पना आली. त्यानंतर या कामासाठी मल्हारने ‘बीच प्लीज’ नावाच्या एका संस्थेची स्थापना केली आणि येथूनच सुरू झाली मल्हारच्या आगळ्यावेगळ्या कर्तव्यपूर्तीची वाटचाल. संस्था स्थापन केल्यानंतर या संस्थेमार्फत साप्ताहिक स्वच्छता अभियान राबवण्यास त्याने सुरुवात केली.
मल्हार आणि त्याच्या साथीदारांनी ८७ आठवड्यांमध्ये दादर चौपाटीवरील जवळपास १००० टन कचरा स्वच्छ केला. त्यानंतर महानगरपालिकेच्या मदतीने हा कचरा डम्पिंग ग्राउंडपर्यंत पोहचवण्यात आला.
याबाबत मल्हार कळंबे म्हणतो, तो जन्मापासून मुंबईमध्ये राहत आहे. दादरलाच असल्यामुळे त्याचे दादर चौपाटीवर येणं-जाणं असायचे. अशातच एक दिवस त्याला आधीची दादर चौपाटी आणि नंतरच्या दादर चौपाटीच्या भयंकर रूपाची जाणीव झाली.आपण ज्या शहरात राहतो, त्याला घडवण्याची आणि बिघडवण्याची शक्ती आपल्या म्हणजेच मानवाच्या हातात असते. याची जाणीव त्याला होती. तसेच त्यासाठी आपण प्रत्येकवेळी सरकारी अधिकार्यांना दोष देऊ शकत नाही. असेही तो याठिकाणी नमूद करतो.
मल्हारने बीच स्वच्छ करण्याची शपथ घेतली होती आणि तेवढ्याच कसोशीने त्याने प्रयत्न करून ती पूर्णदेखील केली. पर्यावरणासाठी मल्हारने केलेलं काम खरचं कौतुकास्पद आहे. सध्या मल्हार आणि त्याची टीम कॉलेज आणि कॉर्पोरेट्स ऑफिसेसमध्ये जाऊन संपर्क साधून त्यांनाही स्वच्छतेसाठी प्रेरित करत आहेत. जर तुम्हालाही मल्हारसोबत या मिशनमध्ये सहभागी व्हायचे असेल तर तुम्हीही या स्वच्छता अभियानाशी जोडले जाऊ शकता. त्यासाठी ९१६७६६०४०३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता.






