स्वदेस न्यूज :- (प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी आहे पंजाबमधून…
प्रशिक्षणादरम्यान वडिलांचं कॅन्सरने निधन झाल्यानंतरदेखील न डगमगता रितिका जिंदल हिने आपले आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. यूपीएससी परीक्षेत ८८ वा क्रमांक मिळवून आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न तिने केवळ २२ व्या वर्षी पूर्ण केले आहे. तिचा प्रेरणादायी आणि जिद्दीचा प्रवास खरोखरीच जाणून घेण्यासारखा आहे.
रितिकाचा जन्म पंजाबमधील मोगा येथे झाला. येथूनच तिने तिचे प्रारंभिक शिक्षण पूर्ण केले. इयत्ता १२ वी मध्ये, रितिकाने उत्तर भारतात CBSE बोर्ड परीक्षेत टॉप केले होते. यानंतर तिने दिल्लीच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून ग्रॅज्युएशन केले. ९५ टक्के गुणांसह रितिकाने संपूर्ण कॉलेजमध्ये तिसरा क्रमांक पटकावला होता.
रितिका जिंदलला लहानपणापासूनच आयएएस व्हायचे होते, त्यामुळे तिने कॉलेजमध्ये असतानाच यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. ग्रॅज्युएट लेव्हलच्या अभ्यासानंतर, रितिका पहिल्यांदाच यूपीएससी परीक्षेला बसली आणि तिने पहिल्याच प्रयत्नात या परिक्षेचे तिन्ही टप्पे पार केले. पण अंतिम यादीत ती काही गुणांनी मागे पडली. मात्र, तिने हार मानली नाही आणि दुसऱ्यांदा यूपीएससी परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतर रितिका जिंदलने कठोर परिश्रम केले आणि सन २०१८ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात ८८ वा क्रमांक मिळवून यूपीएससी परिक्षा पास केली. त्यावेळी रितिका फक्त २२ वर्षांची होती.
रितिका दुसऱ्यांदा परीक्षेची तयारी करत असताना तिच्या वडिलांना फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. रितिकासाठी हा कठीण काळ होता, परंतु असे असतानाही तिने अडचणींना तोंड देत आपली तयारी सुरू ठेवली आणि आज ती आयएएस अधिकारी असून हिमाचल, मंडी येथे एसडीएम पदावर कार्यरत आहे. आपल्या आजारी वडिलांची काळजी घेत रितिकाला यूपीएससी परीक्षेची तयारी करणे खूप कठीण होते.
या विषयी सांगताना ती म्हणाली, “मी एका लहानशा गावातून आले आहे ज्यामध्ये फक्त मूलभूत संसाधने उपलब्ध आहेत. जेव्हा माझे वडील आजारी असायचे तेव्हा आम्हाला त्यांना उपचारासाठी प्रत्येक वेळी लुधियानाला घेऊन जावे लागे आणि मला त्यांच्यासोबत रुग्णालयात जावे लागायचं. माझ्या वडिलांना आयुष्याशी लढताना पाहून मला खूप बळ मिळाले आणि या परीक्षेसाठी मी खूप मेहनत घेतली.
रितिका जेव्हा मसुरी येथे IAS प्रशिक्षण घेत होती, तेव्हा तिच्या वडिलांचा कर्करोगामुळे निधन झालं. रितिकाच्या आई-वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलीने आएएस अधिकारी बनावे. या ध्येयानेच रितिकाने वडिलांच्या निधनानंतरही IAS प्रशिक्षण पूर्ण केले.