लोकसहभागातून साधली किमया
स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे जळगावहून
एकेकाळी पाण्यासाठी झगडणारं गाव अशी ओळख असणारे आणि उन्हाळ्यात टँकरसाठी रांगा लावणारे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील पिंपळे खुर्द गाव आज पाणीदार झाले आहे.
ही किमया पानी फाउंडेशनच्या ‘फार्मर कपमध्ये’ सहभागी झालेल्या ‘धरती माता महिला शेतकरी गटाच्या’ महिलांनी साधली आहे. फार्मर कपमधील गटशेतीने त्यांना एकतेची ताकद शिकवली, आणि ह्याच एकतेच्या जोरावर त्यांनी स्वतःच्या गावाचे चित्र पालटून दाखविले आहे. त्यांनी ही सर्व कामे लोकवर्गणी, सेवा सहयोग संस्था, मारवाड विकास मंच आणि इतर स्थानिक मदत यांच्याद्वारे केली आहेत.
या गटामुळे अनेक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या असून त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. तसेच या महिलांच्या कार्यामुळे गावात त्यांची प्रतिष्ठा देखील वाढली आहे आणि इतर महिलांनाही प्रेरणा मिळाली आहे. या गटाने कामाची सुरुवात नाल्यांची खोली वाढवत केली. त्यांनी पाझर तलावाचं खोलीकरण केलं. नाला खोल केल्यामुळे १३,००० घनमीटर माती काढता आली आणि १.३ कोटी लिटर पाणीसाठा झाला. पाझर तलावाचं ७,००० घनमीटर खोलीकरण करून ७० लाख लिटर पाणीसाठा झाला. आता हा तलाव वर्षभर शेतकर्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे.
या कामामुळे गावात देखील बदल घडून येणार असून रब्बी हंगामात शेवटच्या टप्प्यात सुकणारी पिकं आता वाचणार आहेत. पावसाचं प्रमाण कमी असूनही साठवलेलं पाणी शेतीसाठी पुरेसं ठरणार आहे. उन्हाळ्यात निर्माण होणारा टँकरचा प्रश्न आता संपला आहे. विहिरींची पातळी वाढली असून शेतकरी आत्मविश्वासाने पुढच्या हंगामाचं नियोजन करत आहेत.
या गटाची पुढची दिशा वृक्षलागवड असून महिलांनी ‘बिहार पॅटर्न’नुसार पाझर तलावालगत १,००० झाडं लावली आहेत.बांधावर फळझाडं लावण्याचे नियोजन सुरू आहे.
पिंपळे खुर्दच्या महिलांनी सिद्ध केलंय की, महिलांनी ठरविले तर त्या घरचं काय गावाचही भवितव्य बदलू शकतील.
याविषयी गावकरी भैय्या पाटील म्हणाले, ‘आधी आम्ही विरोध केला होता या महिला काय करू शकतील पाण्याच्या प्रश्नावर? पण आज आनंद वाटतोय, त्यांनी खरंच करून दाखवलं.’
याविषयी शितल पाटील म्हणाल्या, ‘गटात यायचं ठरवलं तेव्हा घरच्यांनी नाही म्हटलं होतं. पण या महिला माझं कुटुंब बनल्या. आम्ही केलेलं काम पाहून घरच्यांचं मतसुद्धा बदललं.’ ‘हे काम आम्ही एकत्र आलो म्हणून शक्य झालं. वर्गणी मागायला गेलो तेव्हा विरोध करणारे लोक आज म्हणतात गावाला जे जमलं नाही ते महिलांनी करून दाखवलं!’






