चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी गाव ठरले राज्यातील पहिले ‘सौरग्राम’
स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे चंद्रपूरहहून
आजही ग्रामीण भागात वीजेची समस्या आहे. अनेक ठिकाणी फक्त रात्रीच विज मिळत असल्याने शेती करण्यात मोठी अडचण येत आहे. दिवसा वीज उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याशिवाय वीजबिलाचा भार पडतो तो वेगळाच. त्यामुळे या सर्व समस्यांवर तोडगा म्हणून आज महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील सादागड हेटी हे छोटेसे आदिवासी गाव वीजेच्याबाबतीत सौरपूर्ण बनले आहे. इथे प्रत्येक घराच्या छतावर सौर पॅनेल बसवले असल्याने सौरउर्जेने गाव उजळून निघाले आहे. त्यामुळेच सादागड हेडी इतर गावांसाठी प्रेरणास्थान बनले असून, राज्यातील पहिले आदिवासी ‘सौर गाव’ बनले आहे.
महावितरण, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी मिळून यशस्वी केलेली पंतप्रधान ‘सूर्यघर मोफत वीज योजना’ अंतर्गत हा चमत्कार घडला आहे. गावात एकूण २० किलोवॅटचे सौर पॅनेल बसवण्यात आले आहेत, जे दरमहा सुमारे २,४०० युनिट वीज निर्मिती करतात.
सादागड हेट्टी गावात एकूण १९ घरे व एक शाळा आहे. सर्व घरांच्या छतावर १ किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवण्यात आले आहे. शाळेत १ किलोवॅटचा पॅनलही (अनुदान न घेता) स्वतंत्रपणे बसवण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत गावकर्यांना ३०,००० प्रति किलोवॅटचे अनुदानही मिळाले. अवघ्या २० दिवसांत हा प्रकल्प पूर्ण झाला आहे.
याविषयी ग्रामस्थ श्रीरंग सोयाम म्हणाले, आधी उन्हाळ्यात वीज बिल १७०० ते १८०० रुपयांचे असायचे. इतके पैसे वाचवणे अवघड होते. पण आता सोलर बसवल्यानंतर बिल शून्यावर येते. यासाठी आम्ही केंद्र शासन आणि प्रशासनाचे खूप आभारी आहोत. आम्हाला वीज बिलातून मोठा दिलासा मिळाला असल्याने, आमच्यावरील आर्थिक ताण कमी झालेला आहे.
सादागड हेट्टी हे गाव घनदाट जंगलात वसलेले आहे. गावकर्यांची उपजीविका प्रामुख्याने जंगलावर अवलंबून आहे. हवामानातील अनियमितता, वीजपुरवठा खंडित होणे आणि आर्थिक अडचणी या त्यांच्या रोजच्या समस्या आहेत. अशा परिस्थितीत सौरऊर्जेने विजेचा पर्याय तर दिलाच शिवाय सक्षमीकरणाचा मार्गही खुला केला. आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त ग्रामीण भाग सौरऊर्जेशी जोडले जातील, ज्यामुळे शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षण दोन्ही सुनिश्चित होईल अशी माहिती महावितरणच्या अधिकार्यांनी दिली.
महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेडने गावकर्यांना आर्थिक मदतीसाठी कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली. सदागड हेटी हे केवळ ऊर्जा स्वयंपूर्णतेचे उदाहरण बनले नाही तर हे गाव पर्यावरण संरक्षण, ग्रामीण विकास आणि तंत्रज्ञानाच्या एकात्मतेसाठी आदर्श बनत आहे.





