स्वदेस न्यूज (विशेष प्रतिनिधी) ः
आजची चांगली बातमी आहे राजस्थानमधून…
सरकारी शिक्षकांच्या निष्काळजीपणाची प्रकरणे दररोज व्हायरल होतात. पण व्हायरल करायचीच तर या चांगल्या शिक्षकाची जी तळमळ आहे ती आपण व्हायरल करूयात. राजस्थानच्या करौली येथे राहणारे शंतनू पराशर हे शिक्षक मुलांना ज्ञानदान करण्यासाठी अक्षरशः पायपीट करून घरोघरी जातो आहे आणि घराघरांत ज्ञानाचा दीप लावतो आहे. सरकारी शिक्षक म्हणून चोख कर्तव्य बजावणारे हे शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये विलक्षण लोकप्रिय आहेत.
गुरु-शिक्षक यांना आपल्या समाजात देवापेक्षाही वरचे स्थान देण्यात आले आहे. अनेकदा शिक्षक वर्गात झोपा काढत असल्याचे, एकमेकांसोबत मारामार्या करत असल्याचे, विद्यार्थ्यांशी जातीय भेदभाव करून त्यांना शिक्षा देत असल्याचे, चुकीचे शिकवत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. पण दाखवल्या जाणाऱ्या या नकारात्मक वातावरणात देखील तळमळीने काम कऱणारे असंख्य शिक्षक समाजात आहेतच. असेच एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे राजस्थान येथील करौलीमधील शंतनु पराशर या शिक्षकाचे.

हे गुरूजी सरकारी शाळेत शिकवतात. पण मुलांना शाळेत शिकवल्यानंतर हे विद्यार्थी घरी अभ्यास करतात की नाही हे पाहण्यासाठी ते रात्री अचानक त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पोहोचतात. विशेष म्हणजे त्यांचे काही विद्यार्थी तर 16 की.मी. अंतरावर राहतात. तरीही मुलांना ज्ञानदानाची आंतरिक तळमळ असल्याने ते विद्यार्थ्यांची घरी जाऊन भेट घेतात आणि त्यांना अभ्यासात मदत करतात.
शासकीय शिक्षकाच्या या अनोख्या मोहिमेमुळे गावातील शासकीय शाळेचा निकालही पूर्वीपेक्षा चांगला लागला आहे. शंतनू पराशर यांची 22 ऑक्टोबर 2010 रोजी करौलीच्या हजारीपूर गावातील ‘उपाध्याय संस्कृत विद्यालय’ या सरकारी शाळेत नियुक्ती झाली.
गावात सोयी-सुविधांचा अभाव असल्याने मुलांची शिक्षणाकडे ओढ कमी आहे. ग्रामीण भागातील मुलांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी ते रात्री गरजेनुसार आणि विशेषत: परीक्षेच्या दिवसांतही त्यांच्या घरी जातात. नियमित संपर्कात राहतात. आपले गुरुजी सदैव आपल्या पाठीशी आहेत असे वाटल्याने मुलेही मग मनापासून अभ्यास करतात आणि आपली गुणवत्ता उंचावण्याचा प्रयत्न करतात.

पराशर सांगतात की, त्यांना गावातील सरकारी शाळेत नियुक्ती मिळाली तेव्हा शाळेत फक्त 156 मुले होती. मात्र त्यांनी ही मोहीम सुरू केल्यावर गावातील मुलांमध्ये शिक्षणाची आवड तर निर्माण झालीच, पण शाळेतील मुलांच्या संख्येबरोबरच गावातील सरकारी शाळेचा निकालही शंभर टक्के लागला.
पराशर हे गावातील मुलांमध्ये पर्यावरण रक्षण आणि देशभक्तीचा संदेश देण्यासाठी दररोज विशेष मोहीम राबवत असतात. त्यांनी आतापर्यंत अनेक मुले दत्तक घेतली आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांना दत्तक घेतल्यानंतर त्यांना शैक्षणिक साहित्यासोबतच आवश्यक ते सर्व साहित्य त्यांच्याकडून पुरवले जाते.






