- समीक्षा वाचककेंद्री व्हावी अशी प्रा. अविनाश सप्रे यांची अपेक्षा
- महाराष्ट्र साहित्य परिषद आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा मराठी विभाग यांच्यातर्फे समीक्षा संमेलन
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून…
आगळ्यावेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात पुणे कायमच अग्रस्थानी असते. या सांस्कृतिक राजधानीत नुकतेच समीक्षा संमेलन भरवण्यात आले होते. या निमित्ताने समीक्षेशी संबंधित मराठी साहित्यावर साधकबाधक चर्चा घडवून आणली गेली. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले होते.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक प्रा अविनाश सप्रे होते. या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुळकर्णी, मराठी विभाग प्रमुख डॉ. वर्षा तोडमल उपस्थित होते.
या प्रसंगी प्रा. सप्रे म्हणाले, मराठीमध्ये लेखकाला केंद्रवर्ती ठेवून चरित्रात्मक समीक्षा, साहित्यकृतीची समीक्षा-भाषा व शैलीची समीक्षा होत आली आहे, पण वाचकाला केंद्रस्थानी ठेवून केलेली वाचककेंद्री समीक्षा झालेली नाही. समीक्षा हा एक गांभीर्यपूर्वक करण्याचा महत्त्वाचा ज्ञानव्यवहार आहे आणि समीक्षक हा वाङ्मयीन संस्कृतीचा जागल्या आहे. आस्वादक समीक्षा हा समीक्षकप्रिय प्रकार असून त्याचे स्वरुप खूपसे भोंगळ आहे, कारण अशी समीक्षा सैद्धांतिकतेच्या स्विकारातून, संस्कारातून निर्माण झालेली नसते. मराठी समीक्षेवर रोमँटीसिझम, आधुनिकता, आधुनिकतावाद आणि उत्तर-आधुनिकतावाद या पाश्चात्त्य वादसंकल्पनांचा प्रभाव आहे. त्यातून प्रसृत झालेली प्रमाणके आहेत, त्यांचे स्वरुप समीक्षकांनी नेमकेपणाने समजून घेऊन त्यांचे उपयोजन केले पाहिजे.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, समीक्षेचे अध:पतन म्हणजे साहित्य व्यवहाराचे अध:पतन. उत्तम कलाकृतींचे सर्जन आणि दुय्यम कलाकृतींचे हनन हा समीक्षकांचा खरा धर्म आहे. त्याचे पालन आज होताना दिसत नाही. सध्या पुस्तक गाजवणे या रोगाने साहित्य विश्वाला ग्रासले असून बेन्टेक्सला सुवर्णपद बहाल करण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे वाचकांची फसवणूक होत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उत्सवी वातावरणात साहित्याविषयी व विशेषत: समीक्षेविषयी गांभीर्याने चर्चा होत नाही, अशी अनेक नामवंत साहित्यिकांची व समीक्षकांची भावना होती. तिचा आदर करून महाराष्ट्र साहित्य परिषदेने २०११ सालापासून संमेलनाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला.
बाबासाहेब शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. सुनिताराजे पवार यांनी प्रास्तविक केले. डॉ. वर्षा तोडमल यांनी आभार मानले.
संमेलनात मांडले गेलेले प्रमुख मुद्दे
- साहित्यामध्ये नवनवीन प्रवृत्ती, प्रवाह आणि प्रेरणा निर्माण होत असतात, त्यांचा अन्वयार्थ लावणारी, आकलन घडवणारी नवी समीक्षाही निर्माण होणे आवश्यक असते. नवी परिभाषा अस्तित्वात येणे गरजेचे असते. त्यासाठी समीक्षेत साचलेपण येऊन चालत नाही.
- मराठी समीक्षेमध्ये व्यवस्थेपेक्षा गोंधळ जास्त आहे, समजापेक्षा गैरसमज जास्त आहेत आणि ते निर्माण व्हायला लेखक, वाचक आणि समीक्षक आपापल्या परीने जबाबदार आहेत.
- समीक्षेसंबंधी अकारण बोलतो लिहितो तेव्हा आपण भाषिक साहित्य विचारात घेतो पण त्याच बरोबर संगीत, चित्रपट, चित्रकला, नृत्यकला इ. ललितकलांचीही योग्य समीक्षा होणे महत्त्वाचे असते. या बाबीकडे आपल्या समीक्षेने दुर्लक्ष केलेले दिसते. त्यामुळे या कलांच्या बाबतीत आपण अडाणी आहोत.
- या कलांवरची समीक्षा वा लेखन वरवरचे असते. आपली समीक्षा अधिक आकलन समृद्ध करण्यासाठी विविध ज्ञानशाखेतून पुढे आलेल्या संकल्पनांचा उपयोग होऊ शकतो. म्हणून समीक्षकांनी आंतर विद्याशाखीय पद्धतीचा वापर करायला हवा.
- मराठी समीक्षा विश्वामध्ये भालचंद्र नेमाडे यांनी मांडलेल्या देशीवाद या वादसंकल्पनेची मोठ्या प्रमाणावर चर्चा गेली काही वर्षे जोरात होत आहे. नेमाडेंनी या भूमिकेतून काही समीक्षा प्रमाणके पुरस्कारलेली आहेत. ती लक्षात घ्यायला हवीत.
- मराठीमध्ये सध्या अनुवाद मोठ्या प्रमाणावर होत आहेत. पण त्यातील सकस निकसता ठरवणारी समीक्षा मात्र होत नाही. भाषांतर विद्या ही एक ज्ञानशाखा आहे. त्याची सैद्धांतिक मांडणी मराठीत व्हायला हवी तसेच बाल साहित्य ही अलक्षीत आहे. या प्रकाराच्या साहित्याची प्रमाणके समीक्षेने प्रस्थापित करायला हवीत.






