स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे आळंदीहून
राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबांमधील मुलामुलींना मोफत निवासासह शिक्षण देण्याचा निर्धार आळंदी येथील ‘स्नेहवन’ या सामाजिक संस्थेने घेतला आहे.
आत्महत्याग्रस्त व गरीब शेतकर्यांच्या मुलांना निवारा देणारे ‘स्नेहवन’ म्हणजे मराठवाड्यातील शेतकरी अशोक देशमाने या उच्चशिक्षित तरुणाने कष्टातून साकारलेला एक सर्वोत्तम प्रकल्प असल्याचे मानले जाते.
अशोक देशमाने हे शेतीत राबून आयटी इंजिनिअर बनले. मात्र, त्यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून दिली आणि आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलांना दत्तक घेउâन ‘स्नेहवन’ प्रकल्प सुरू केला. आळंदी मार्गावर भोसरीच्या चक्रपाणी वसाहतीमध्ये अकरा मुलांना आसरा देत पत्रांच्या खोलीत देशमाने दांपत्याने आठ वर्षांपूर्वी स्नेहवन सुरू केले होते. त्यांची जिद्द पाहून पुण्यातील डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी स्वमालकीची दोन एकर जागा स्नेहवनला दान केली.
राज्यातील दानशुरांच्या मदतीमुळे आळंदी वडगाव मार्गावरील कोयाळी फाट्यावर आता ‘स्नेहवन’ नव्या स्वरूपात उभारले गेले आहे. विशेष म्हणजे देशमाने यांची पत्नी अर्चना देशमाने यांनीही या कार्याला सारे आयुष्य समर्पित केले आहे. या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील १०० आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलामुलींच्या संपूर्ण संगोपनाची जबाबदारी ते घेत आहोत.
स्नेहवनमध्ये केवळ निवास व शिक्षण मोफत दिले जात नसून मुलांना संगणक, योग, संगीत, मल्लखांब विद्या शिकवली जाते. मुलांसाठीr येथे १५ हजार पुस्तकांचे ग्रंथालय, गीर गाईचे दूध आणि व्यायामशाळा अशा सुविधा उभारण्यात आल्या आहेत. आता ४५०० चौरस फुटाची आणखी एक इमारत तयार होत असून, तेथे ५० मुलींचे स्वतंत्र वसतिगृह उभे राहील. त्यामुळे एकूण १५० मुलांची काळजी स्नेहवन घेईल.
शेतकर्यांच्या मुलांना शेतीआधारित कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण देण्याची सुविधादेखील स्नेहवनमध्ये आहे. मुलांना गोठ्यात दूध काढण्यापासून ते पनीर, खवा बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. तेलघाणा, डाळ निर्मिती, मसाले, पापड तयार करणेदेखील शिकवले जाते.
स्नेहवनचा उद्देश बारावीपर्यंत मुलांना गुणवत्तापूर्ण निवासी शिक्षण देण्याचा असला तरी कष्टाळू व हुशार मुलांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देण्याची किमया देशमाने दांपत्याने साधली आहे. त्यामुळेच स्नेहवनमधील काही मुलेआता बीसीए, बीकॉम, एमएस्सीपर्यंत शिक्षण घेत आहेत. या कार्यातून एक आत्महत्या थांबली तरी आमचा उद्देश सफल झाला असे देशमाने यांना वाटते.
याविषयी अशोक देशमाने म्हणतात की, मी स्वतः शेतकरी असून, कष्ट करीत शिकलो; पण मी सुखात जगण्यासाठी शहरात आलो नसून समाजाचे काही तरी देणे लागतो या विचाराने प्रेरित झालो. त्यामुळेच मी नोकरी, घरदार सोडून आळंदीला आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलांसाठी ही संस्था उभारली. तेथे उत्तम शिक्षणासह आदर्श संगोपन केले जाते. शेतकर्यांच्या मुलांच्या बुद्धी, मन आणि शरीराचा सर्वांगिण विकास व्हावा हे माझे ध्येय आहे. राज्यातील गरजू शेतकरी कुटुंबांनी त्यांची मुले स्नेहवनमध्ये पाठवावीत.
शिक्षणाची हेळसांड होणार्या गरीब व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांनी गुराढोरांमागे न जाता किंवा मजुरी न करता चांगले शिक्षण घेत आदर्श नागरिक बनावे, हा आमचा एकमेव उद्देश असल्याचे ते सांगतात.







Great work 💐💐