स्वदेस न्यूज (पराग पोतदार) : केंद्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वीरगाथा या उपक्रमामध्ये दोन कोटी मुले सहभागी झालेली आहेत. त्यामध्ये आपल्या कोकणची कन्या म्हणून प्रसिद्ध असणारी सावी मुद्राळे हिची निवड झाली आहे. ती आता दिल्लीमध्ये जाणार आहे.
या स्पर्धेतून १०० मुलांची निवड करण्यात आली. त्यामध्ये सावीचा क्रमांक दहावा आला आहे. त्याअंतर्गत दिनांक २५ जानेवारीला संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते या निवडक मुलांचा दिल्लीमध्ये सन्मान होणार आहे. त्याचप्रमाणे दिनांक २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे संचलन दिल्लीमध्ये होते त्यासाठी सावी व तिच्यासमवेत निवडलेल्या मुलांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांना हे संचलन प्रत्यक्ष पाहण्याची संधी त्यामुळे मिळणार आहे.
कोकणकन्या नावाने लोकप्रिय असलेली सावी मुद्राळे ही सोशल मीडियावर एक प्रसिद्ध मराठी व्यक्तिमत्त्व आहे, झी मराठी ड्रामा ज्युनिअर्स’मधील कामगिरी आणि कोकणावरील प्रेमासाठी ती सगळीकडे लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे हजारो फॉलोअर्स असून ती कोकणची संस्कृती आणि जीवनशैली दाखवणारी रील नियमितपणे शेअर करते.
मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे यांनी एक्सवर पोस्ट करत कणकवलीची कोकणकन्या सावी मुद्राळे हिचं कौतुक केले आहे. तसेच कोकणातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.
काय आहे प्रोजेक्ट वीर गाथा?
या वर्षी सुमारे 1.92 कोटी विद्यार्थ्यांनी ‘प्रोजेक्ट वीर गाथा’मध्ये सहभाग घेतला. हे विद्यार्थी देश-विदेशातील सुमारे 1.90 लाख शाळांमधून सहभागी झाले होते. ‘प्रोजेक्ट वीर गाथा’ हा प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाअंतर्गत संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय यांचा संयुक्त राष्ट्रीय उपक्रम आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, 2021 मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाल्यानंतरचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक सहभाग असलेला उपक्रम ठरला आहे. यावर्षी ‘वीर गाथा 5.0’ ची सुरुवात 8 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आली. विद्यार्थ्यांचा सर्जनशील सहभाग वाढवण्यासाठी यंदा अनेक नवीन वैशिष्ट्ये जोडण्यात आली. प्रथमच शॉर्ट-व्हिडिओ जसे की व्हिडिओग्राफी, अँकरिंग, रिपोर्टिंग आणि स्टोरीटेलिंग यांचा समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना सामरिक परंपरा, भारताच्या समृद्ध लष्करी परंपरा, रणनिती, मोहिमा आणि वीरगाथांवर आधारित सामग्री तयार करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
‘वीर गाथा 5.0’ उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी कलिंगचा राजा खारवेल, पृथ्वीराज चौहान, छत्रपती शिवाजी महाराज, 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामातील वीर, तसेच आदिवासी चळवळींचे नेते अशा अनेक महान भारतीय योद्ध्यांच्या अदम्य शौर्य आणि लष्करी रणनितींचा मुलांनी अभ्यास केला.
100 विद्यार्थ्यांनी सिद्ध केली आपली शौर्य आणि प्रतिभा
संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे की विषयांच्या या वैविध्यामुळे केवळ प्रविष्ट्यांची गुणवत्ता वाढली नाही, तर विद्यार्थ्यांची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक समजही अधिक सखोल झाली. ‘वीर गाथा’च्या या आवृत्तीत राष्ट्रीय पातळीवर 100 ‘सुपर-विजेते’ निवडले गेले आहेत.
सर्वांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळेच हे सारे होऊ शकले आहे. त्यामुळे तिथे जाऊनही मी चांगली कामगिरी नक्की करेन, अशी भावना सावीने व्यक्त केली आहे.





