- तब्बल 351 बेपत्ता लोकांना मिळवून दिले स्वतःचे घर
- वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनमध्ये विक्रमाची नोंद
स्वदेस न्यूज:- (प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी आहे मुंबईहून…
आपला नोकरी धंदा सांभाळून काहीजण समाजसेवेचं व्रतही जपतात. मुंबईतील शिवाजी खैरनार यांनीही असंच एक व्रत जपलंय.
2018 पासून पोलीस मित्र म्हणून काम करणाऱ्या या देवदूताने हरवलेल्यांना घर मिळवून द्यायचा वसा घेतला आहे. त्यांनी थोड्याथोडक्या नव्हे तर ३५१ लोकांना हक्काचे घर मिळवून दिले आहे.
एखादी व्यक्ती हरवल्याचं प्रकरण समजलं की ते त्याचा शोध सुरू करतात. त्यांच्या या कार्याची दखल जागतिक पातळीवरही घेण्यात आली आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनतर्फे त्यांच्या या कार्याची विक्रमी नोंददेखील झाली आहे.
शिवाजी खैरनार सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून हा शोध घेतात. या विषयी ते सांगतात, “मी स्वतः बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचा सहकार्यवाह असल्यामुळे मुंबईमधील गणेशोत्सव मंडळांच्या व्हाट्सअप ग्रुपवर व दहीहंडी समन्वय समितीमध्ये असल्यामुळे दहीहंडी मंडळाच्या ग्रुपवर माहिती देतो. तसेच नवरात्र उत्सव मंडळ, विविध सामाजिक ग्रुपमध्येही हरवलेल्या व्यक्तीची माहिती देऊन शोध घेतो. या माध्यमातून अनेकदा बेपत्ता झालेल्या व्यक्ती सापडतात आणि त्यांना त्यांचे घर पुन्हा मिळते.”
460 लोकांचे ब्रॉडकास्ट ग्रुप
या शोध मोहिमेत अनेक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, दहीहंडी मंडळ, नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्ते जोडले गेले आहेत. ज्यांना समाजासाठी काहीतरी करायचे आहे, असे काही सुज्ञ नागरिकही या शोध मोहिमेचा भाग झाले. त्यामुळे आतापर्यंत 460 लोकांचे ब्रॉडकास्ट ग्रुप त्यांच्याकडे तयार झाले आहेत. या माध्यमातून आतापर्यंत यशस्वी शोध मोहीम राबवून 351 नागरिकांना सुखरूप घरी पोहोचवले आहे.
शिवाजी खैरनार यांच्या कार्याचा देश विदेशातून गौरव करण्यात आला आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनने त्यांच्या कार्याची दखल घेऊन सन्मानित केले आहे. ऑप्टिमास्टिक शाळेतर्फे समाज रत्न पुरस्कार, अष्टगंध संस्थेतर्फे समाजरत्न पुरस्कार , मुंबई उद्योजक मध्येही मराठी चित्रपट सेनेतील पूजा सावंत यांच्या हस्ते सामाजिक कार्याचा सन्मान करण्यात आला आहे.






