स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची बातमी आहे मुंबईहून
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा, ऐतिहासिक स्थळांची माहिती व्हावी, गडकिल्ले पहाता यावे, राज्याची संस्कृती समजावी यासाठी आयकॉनिक रेल्वे टूरची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले रेल्वेटूरच्या माध्यमातून पाहता येणार आहेत. ही टूर जवळपास दहा दिवसांची असणार आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या रेल्वेच्या योजनांची माहिती दिली. यात छत्रपती शिवाजी महाराज सर्कीट ट्रेनचीही घोषणा करण्यात आली आहे. या सर्किट ट्रेनच्या माध्यमातून राज्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देता येणार आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईतील बरेच रेल्वे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. शिवाय राज्यातील 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. महाराष्ट्रासाठी 1 लाख 73 हजार कोटीचे रेल्वे प्रकल्प उभारले जाणार आहेत. यावर्षी जवळपास 24 हजार कोटी राज्याच्या पदरात पडले आहेत.
या सर्वाचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन आहे. या शिवाय विदर्भावरही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. रेल्वेच्या माध्यमातून विदर्भाचा छत्तीसगड-तेलंगणा बरोबर व्यवहार वाढणार आहे. गोंदिया बल्लारशा रेल्वे लाईनचे दुहेरीकरण होणार आहे. यासाठी 4819 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आहेत. हा मार्ग झाल्यास त्याचा फायदा थेट विदर्भाला होणार आहे. व्यापार व्यवसाय वाढण्यास याचा फायदा होईल. शिवाय दुसऱ्या राज्याच्या सीमेपर्यंत हा मार्ग जात आहे. दुर्गम जिल्हा त्याला जोडला गेला आहे. त्यामुळे जिल्ह्या बरोबरच इतर भागाचाही त्यातून विकास होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील जवळपास 132 स्थानकांचा विकास केला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ही 132 स्टेशन्स महाराष्ट्रातील केंद्र सरकारने रेल्वे मिनिस्ट्री डेव्हलपमेंट करता घेतलेली आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा देखील समावेश आहे. रेल्वे मंत्रालयाने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या पदरात दान टाकले आहे. त्यामुळे रेल्वेचे मोठे जाळे आणि सुधारणा होण्यास मदत होणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.