स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
देशसेवेनंतर आता पर्यावरण रक्षणासाठी झटणाऱ्या माजी सैनिकाने उल्लेखनीय कार्य करून दाखवले आहे. माजी हवालदार रमेश खरमाळे यांनी केवळ दोन महिन्यांत ७० चर खोदून तब्बल ८ लाख लिटर पावसाचे पाणी साठवण्याचा पराक्रम केला आहे.
२०१२ साली सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर रमेश खरमाळे यांनी २०१३ पासून पर्यावरण संवर्धनाचे कार्य सुरू केले. सैन्यात १७ वर्षे सेवा दिल्यानंतर आईच्या उपचारांसाठी त्यांना निवृत्ती घ्यावी लागली. मात्र, घरी परतल्यानंतर समाजासाठी काहीतरी करण्याचा निर्धार त्यांनी केला. जुन्नर परिसरातील जैवविविधतेचा अभ्यास करताना त्यांना झाडांची संख्या वाढवणे गरजेचे असल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी वृक्षारोपणाला सुरुवात केली आणि पुढे वनविभागात वनरक्षक म्हणूनही काम पाहिले. मात्र, झाडांच्या संगोपनासाठी पाण्याची मोठी अडचण जाणवत होती.

या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी पावसाचे पाणी साठवण्याचा मार्ग निवडला. २०२१ साली रमेश खरमाळे आणि त्यांच्या कुटुंबाने सलग ६० दिवस मेहनत घेऊन जुन्नर तालुक्यातील धामणखेल गावाजवळील डोंगरावर ७० चर खोदले.
या उपक्रमामुळे आज धामणखेल गावातील विहिरींमध्ये वर्षभर पाणी उपलब्ध राहते. तसेच परिसरातील झाडेही हिरवीगार आणि टवटवीत राहू लागली आहेत. सध्या ते या ठिकाणी ‘ऑक्सिजन पार्क’ उभारण्याच्या दिशेनेही प्रयत्न करत आहेत.

एकेकाळी देशाच्या सीमेवर उभे राहून संरक्षण करणारे रमेश खरमाळे आज निसर्गाचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यांच्या या कार्यातून “Once a Soldier, Always a Soldier” या उक्तीचा प्रत्यय येत आहे.





