स्वदेस न्यूज(प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी आहे साताराहून
अभिजात मराठी भाषेचा उत्सव असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीतील एक महत्त्वाचे पान. पुढील वर्षी साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील खण आळीतील पाठकजी कुटुंबाने ‘ज्ञानगणेश साहित्य संमेलन विशेष’ ही सजावट घरगुती गणपतीसमोर साकारली आहे. यापूर्वीही ‘संगीत गणेश’, ‘क्रीडा गणेश’, ‘अर्थ गणेश’, ‘वारली गणेश’ आदी संकल्पनांवर आधारित संकल्पना साकारल्या गेल्या असून हे सजावटींचे सलग दहावे वर्ष आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, मसापचे कार्यवाह शिरीष चिटणीस, मसाप शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांनी या सजावटीचे उद्घाटन केले.
सजावटीमध्ये ग्रंथदिंडी, साहित्य संमेलन मंडप, पुस्तकांचे स्टॉल, कविकट्टा आणि इतर विविध परिसंवादाची व्यासपीठे यांची लघुरूपे साकारली आहेत. आतापर्यंत झालेल्या ९८ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची छायाचित्रेही एकत्र करण्यात आली आहेत. साहित्य संमेलन साताऱ्यात होत असल्यामुळे साताऱ्यातील प्रमुख लेखकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे, साताऱ्यातील लेखक-कवींची यादी, साताऱ्यात झालेल्या साहित्य संमेलनांमधील अध्यक्षांचे विचार, साहित्य संमेलनावरील पुस्तकांची मुखपृष्ठे, संमेलन अध्यक्षांची माहिती देणारी दिनदर्शिका आदी गोष्टीही सजावटीमध्ये मांडण्यात आल्या असून, प्रस्तावित संमेलनाची निमंत्रण पत्रिका आणि संमेलनानंतर होणाऱ्या स्मरणिकेचे संकल्पचित्रही साकारले आहे.
साहित्य संमेलनाची ही नगरी साताऱ्यातील ज्येष्ठ कलाशिक्षक शेखर हसबनीस आणि त्यांची कन्या श्वेता यांच्या प्रयत्नांतून साकारली आहे. तर ९८ संमेलनाध्यक्षांच्या छायाचित्रांच्या संकलनाचे अतिशय आव्हानात्मक काम साताऱ्यातील ज्येष्ठ छायाचित्रकार नरेंद्र जाधव यांनी केले आहे. साहित्यिक आणि इतर संदर्भांसाठी श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाच्या सेवकवर्गाचे सहकार्य लाभले असून, चंद्रकांत चिंचकर आणि सारंग किरपेकर यांनी डिझाईन आणि डीटीपी साह्य केले आहे. संमेलनविषयक पुस्तकांसाठी पुण्याचे ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र गुर्जर आणि डोंबिवलीचे ज्येष्ठ लेखक-समीक्षक रविप्रकाश कुलकर्णी यांची मोलाची मदत झाली आहे.
सजावटीबद्दल बोलताना शिरीष चिटणीस यांनी पाठकजी कुटुंबाच्या उपक्रमाचे कौतुक केले. ‘‘या प्रकारच्या उपक्रमातून अभिजात मराठी भाषेची गोडी लावण्यासाठी निश्चित प्रयत्न होतील. साताऱ्यातील संमेलन यशस्वी होण्यासाठी असे उपक्रम व्हावेत,’’ असे चिटणीस यावेळी म्हणाले. तसेच मराठी साहित्य संमेलनाच्या वातावरणनिर्मितीसाठी करण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद आहे, असे डॉ. राजेंद्र माने म्हणाले.
यावेळी लेखक-समीक्षक पद्माकर पाठकजी म्हणाले, मराठी भाषेला साहित्य संमेलनाची मोठी परंपरा आहे. ही परंपरा गणेशापुढील सजावटीच्या रूपाने मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठी भाषेची आवड आजच्या पिढीमध्ये यावी या हेतूने ही सजावट साकारली आहे.
याबद्दल बोलताना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी म्हणाले, ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पाठकजी कुटुंबीयांनी केलेली गणेश सजावट कौतुकास्पद आहे. येणारे संमेलन यशस्वी होण्यासाठी प्रत्येक सातारकराने त्यात सहभागी व्हावे. पाठकजी यांच्या या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा.






