प्रत्येक घरात जन्मतो एक सैनिक
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे साताराहून
सातारा जिल्ह्यातील गाव मिलिटरी आपशिंगे या नावातच देशसेवेचे व्रत आहे. या गावातील प्रत्येक घरातील एक जण सैन्यात किंवा सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू झालेली ही परंपरा आजही कायम आहे. या गावात १६५० पेक्षा अधिक जवानांनी सैन्यात आणि इतर सुरक्षा दलात सेवा बजावली आहे.
पहिल्या महायुद्धापासून ते कारगील युद्धापर्यंत येथील अनेक सैनिकांनी देशासाठी बलिदान दिलंय. इंग्रजांच्या काळात पहिल्या महायुद्धात या गावातील ४६ जवान शहीद झाले होते. यामुळे इंग्रजांनी या गावाचे नाव मिलिटरी आपशिंगे असे ठेवले. दुसर्या महायुद्धातही गावातील चार जण शहीद झाले. १९६२ मधील युद्धात चार आणि १९६५ आणि १९७१ मध्ये पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात एक-एक जवान शहीद झाला होता.
सातारा जिल्ह्यातील अनेक गावांतील अनेक जण सैन्यात आणि सुरक्षा दलात आहेत. हे जवान मराठा रेजिमेंट, महार रेजिमेंट, इंजिनिअर रेजिमेंट, मद्रास रेजिमेंटमध्ये कार्यरत आहेत. तसेच नौदल, हवाईदल, बीएसएफ, सीआरपीएफ आणि इतर सुरक्षा दलांत मोठ्या संख्येने जिल्ह्यातील जवान सेवा बजावत आहेत. येथील एका कुटुंबातील २३ जणांनी सैन्यात सेवा दिली आहे. ८१ वर्षांचे निवृत्त कॅप्टन लक्ष्मण कारंडें यांचे ते कुटुंब असून त्यांची चौथी पिढी सैन्यात आहे. पुतण्या विश्वास मेजर जनरल पदापर्यंत पोहोचला आहे.
आपशिंगे गावात एक विजयस्तंभ आहे. हा गावच्या इतिहासाचा वारसा सांगणारा साक्षीदार आहे. विजय स्तंभाच्या पाठीमागच्या बाजूला गावातील सैनिकांच्या पराक्रमाचा इतिहास आहे.इंग्रजांच्या काळात पहिलं महायुद्ध झालं. तेव्हा या गावातील ४६ सैनिक शहीद झाले होते. याची शिळा विजयस्तंभावर लावण्यात आली आहे. १९६२ मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धात गावातील चार जवान शहीद झाले. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये शहीद झालेले सुभेदार दिनकर भैरू पवार यांची नावे देखील येथे आहेत. त्याचबरोबर आझाद हिंद सेनेमध्ये गावातील चार जण सहभागी होते. त्यांची नावेही याठिकाणी आहेत. एकंदरीतच या विजय स्तंभाला भेट दिल्यानंतर या गावाचा इतिहास आणि वारसा लक्षात येतो.
मुलांच्या जन्मापासूनच त्यांचं सैन्यात जाण्यासाठीचं ट्रेनिंग याठिकाणी सुरू होतं. येथील गावात श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात मुलांना परेड, ड्रिल शिकवले जाते. याविषयी नववीच्या सौरभ निकमचे म्हणणे आहे की, गावाचे ब्रीदवाक्यच आहे – ‘इथे घडती वीर जवान.’
याविषयी सैन्यातून कॅप्टन पदावरून निवृत्त झालेले शंकरराव देशमुख यांनी सांगितले की, ज्या पद्धतीने शिक्षकाचा मुलगा शिक्षक आणि इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर बनतो, तसेच आपशिंगे गावात सैनिकी परंपरा आहे.






